सोमवार, ११ मे
देवाचा अनादर करणाऱ्या कथा कहाण्यांपासून दूर राहा.—१ तीम. ४:७.
जर तुम्ही आपल्या संघटनेबद्दल किंवा पुढाकार घेणाऱ्या भावांबद्दल चुकीची माहिती ऐकली तर देवाचे शत्रू येशूसोबत आणि पहिल्या शतकातल्या त्याच्या शिष्यांसोबत कसे वागले हे आठवायचा प्रयत्न करा. येशूने म्हटलं होतं, की यहोवाची उपासना करणाऱ्यांचा लोक छळ करतील आणि त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवतील. आणि आज अगदी तसंच घडत आहे. (मत्त. ५:११, १२) खोट्या माहितीमागे कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि लगेच पावलं उचलली पाहिजेत. जर आपण असं केलं तर खोट्या माहितीमुळे आपली फसवणूक होणार नाही. पण मग आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत? खोट्या माहितीपासून दूर राहा. आपण खोटी माहिती ऐकली असेल, तर आपण काय केलं पाहिजे याबद्दल प्रेषित पौलने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. प्रेषित पौलने तीमथ्यला सांगितलं होतं, की त्याने इफिसमधल्या लोकांना ‘काल्पनिक कथांकडे [खोट्या माहितीकडे] लक्ष न देण्याची आज्ञा’ द्यावी. तसंच, त्याने त्याला हेही सांगितलं, की त्याने “काल्पनिक आणि देवाचा अनादर करणाऱ्या कथा कहाण्यांपासून दूर” राहावं. (१ तीम. १:३, ४) आपण खोट्या माहितीपासून दूर राहतो, कारण त्यामागे कोण आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याऐवजी आपण फक्त सत्याची ‘फायदेकारक वचनं’ ऐकतो.—२ तीम. १:१३. टेहळणी बुरूज२४.०४ ११ ¶१६-१७
मंगळवार, १२ मे
ते गोड बोलून आणि खुशामत करून भोळ्याभाबड्या लोकांची मनं भुलवतात.—रोम. १६:१८.
जे यहोवाशी एकनिष्ठ आहेत त्यांना जडून राहा. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण एकतेने त्याची उपासना करावी. जोपर्यंत आपण सत्याला धरून राहतो, तोपर्यंत आपल्यातली एकता टिकून राहील. सत्यापासून भरकटलेले लोक मंडळीत फुटी पाडतात. म्हणून “त्यांना टाळा,” असं देव आपल्याला इशारा देतो. आपण जर असं नाही केलं, तर आपणसुद्धा सत्यापासून भरकटू शकतो. (रोम. १६:१७) जेव्हा आपण सत्य ओळखतो आणि त्याला धरून राहतो, तेव्हा आपण यहोवाच्या जवळ राहू शकतो आणि विश्वासात मजबूत होऊ शकतो. (इफिस. ४:१५, १६) तसंच, सैतानाच्या खोट्या शिकवणी आणि तो पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होईल आणि मोठ्या संकटादरम्यान यहोवा आपली काळजी घेईल. म्हणून जे सत्य आहे, ते धरून राहा म्हणजे “शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.”—फिलिप्पै. ४:८, ९. टेहळणी बुरूज२४.०७ १२-१३ ¶१६-१७
बुधवार, १३ मे
या माणसाने पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं.—इब्री १०:१२.
पापाच्या ओझ्यामुळे दबलेल्या लोकांवर येशूने खास लक्ष दिलं. त्याने त्यांना त्याचे शिष्य बनण्याचं आमंत्रण दिलं. त्याला माहीत होतं की मानवजातीच्या दुःखाचं मूळ कारण पाप आहे. त्यामुळे त्याने पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांना स्वतःहून मदत केली. एका उदाहरणाचा वापर करून त्याने असं समजावलं: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.” याबद्दल तो पुढे म्हणाला: “मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” (मत्त. ९:१२, १३) येशू जे बोलला त्याप्रमाणे त्याने केलंसुद्धा. जेव्हा एका पापी स्त्रीने अश्रूंनी त्याचे पाय भिजवले, तेव्हा त्या स्त्रीची पापं त्याने प्रेमळपणे क्षमा केली. (लूक ७:३७-५०) तसंच, एकदा एका विहिरीजवळ त्याला एक शोमरोनी स्त्री भेटली. त्याला तिच्या अनैतिक जीवनाबद्दल माहीत होतं, तरीसुद्धा त्याने तिला महत्त्वाची सत्यं शिकवली. (योहा. ४:७, १७-१९, २५, २६) पापाचा सर्वात भयानक परिणाम म्हणजे मृत्यू. पण देवाने येशूला मृत्यूही काढून टाकण्याची ताकद दिली. ते कसं? येशूने स्त्री-पुरुषांना, लहान-मोठ्यांना पुन्हा जिवंत केलं.—मत्त. ११:५. टेहळणी बुरूज२४.०८ ४ ¶९-१०