सोमवार, ३१ ऑगस्ट
माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर.—स्तो. ५६:८.
दावीदच्या जीवनात अशा बऱ्याच कठीण समस्या आल्या, ज्यांमुळे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. लोकांनी त्याचा द्वेष केला. इतकंच काय, तर त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा विश्वासघातही केला. (१ शमु. १९:१०, ११; २ शमु. १५:१०-१४, ३०) त्याच्या आयुष्याच्या एका कठीण काळात त्याने असं म्हटलं: “मी कण्हून कण्हून थकलोय; रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो; माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.” (स्तो. ६:६) दावीदच्या जीवनात इतक्या समस्या आल्या तरी त्याला या गोष्टीची खातरी होती, की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याने असं लिहिलं: “यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.” (स्तो. ६:८) आजच्या वचनातल्या शब्दचित्रावरून स्पष्ट होतं, की यहोवा किती प्रेमळ देव आहे. दावीदला असं वाटलं जणू काही यहोवाने त्याचे अश्रू बुधलीत जमा केलेत किंवा एका वहीत त्यांची नोंद करून ठेवली आहे. दावीदला हे माहीत होतं, की यहोवाने त्याचा त्रास पाहिलाय आणि त्याच्या तो लक्षात आहे. दावीदला एका गोष्टीची पक्की खातरी होती. ती म्हणजे, त्याच्या प्रेमळ पित्याला त्याच्या समस्याच नाही, तर त्या समस्यांमुळे त्याच्यावर जो परिणाम होतोय तोसुद्धा माहीत आहे. टेहळणी बुरूज२४.१२ २२-२३ ¶११-१२
मंगळवार, १ सप्टेंबर
तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा.—२ करिंथ. १३:५.
आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ होण्यासाठीच नाही, तर आपली प्रौढता टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा मेहनत घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आपण असा विचार नाही केला पाहिजे, की आपल्याला आणखी प्रगती करायची गरज नाही. (१ करिंथ. १०:१२) उलट आपण आध्यात्मिक रितीने प्रगती करत आहोत की नाही हे आपण “सतत तपासून” पाहिलं पाहिजे. प्रेषित पौलने कलस्सैकरांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने पुन्हा एकदा ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवणं किती गरजेचं आहे यावर जोर दिला. तिथल्या भाऊबहिणींची आध्यात्मिक रितीने वाढ झाली असली, तरी पौलने त्यांना जगाच्या विचारसरणीचा स्वतःवर प्रभाव न होऊ देण्याचा इशारा दिला. (कलस्सै. २:६-१०) तसंच, तिथल्या मंडळीतल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे ओळखत असलेला एपफ्राससुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यांनी “स्थिर उभं राहावं” म्हणजेच त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हावं अशी तो प्रार्थना करत होता. (कलस्सै. ४:१२) यातून आपल्याला काय समजतं? पौल आणि एपफ्रास या दोघांनाही हे माहीत होतं, की आपल्याला जर आपली ख्रिस्ती प्रौढता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्याला स्वतः मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासोबतच यहोवाच्या मदतीचीसुद्धा गरज पडेल. पौल आणि एपफ्रास यांची अशी इच्छा होती की, कलस्सैमधल्या भावांना समस्यांचा सामना करावा लागत असला तरी त्यांनी आध्यात्मिक रितीने प्रौढ असावं. टेहळणी बुरूज२४.०४ ६-७ ¶१६-१७
बुधवार, २ सप्टेंबर
आपल्यासोबत यहोवा आहे! म्हणून त्यांना मुळीच घाबरू नका.—गण. १४:९.
यहोवाबद्दल योग्य भीती बाळगणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं. इतकं की त्याचं मन दुखावेल अशी कोणतीच गोष्ट न करणं. म्हणूनच आपण त्याची मर्जी मिळवायला योग्य आणि अयोग्यमधला, सत्य आणि असत्यामधला फरक ओळखायला आतुर असतो. (नीति. २:३-६; इब्री ५:१४) आपण देवाची भीती बाळगण्यापेक्षा जर माणसांना घाबरलो तर आपण सत्यापासून भरकटून जाऊ. यहोवाने इस्राएली लोकांना कनान देश द्यायचं वचन दिलं होतं. या देशाची पाहणी करायला ज्या १२ हेरांना पाठवलं होतं त्यांचा विचार करा. त्यांच्यापैकी दहा हेरांच्या मनात यहोवावरच्या प्रेमापेक्षा कनानी लोकांची भीती जास्त होती. त्यांनी इतर इस्राएली लोकांना सांगितलं, की “आपण त्या लोकांशी लढू शकत नाही. कारण ते आपल्यापेक्षा ताकदवान आहेत.” (गण. १३:२७-३१) मानवी दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कनानी लोक खरोखरच ताकदवान होते. पण इस्राएली लोक त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकणार नाहीत, असं जे त्यांनी म्हटलं त्यावरून कळतं, की ते यहोवाबद्दल विचार करत नव्हते. टेहळणी बुरूज२४.०७ ९-१० ¶५-६